बंद

जिल्ह्याची ओळख

जालना जिल्‍हा  स्‍वतंत्र  भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे.

जालना जिल्‍हा हा पुर्वी निझाम राज्‍याचा भाग होता. मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्‍हयामधील जालना एक तालुका झाला.

जालना हा छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद)चा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व छ. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, छ. संभाजीनगर पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे.

जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्‍यामध्‍ये जालना जिल्‍हा प्रसिध्‍द आहे.

जालना जिल्‍हयातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्रामामध्‍ये महत्‍वाची भूमीका पार पाडली होती. श्री जनार्धन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली.

स्थान व भौगोलिक परिस्थिती –

भौगोलिकद्ष्टया जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते.

2011 च्या जनगणनेनुसार जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत 2.51 % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 1.32 % म्हणजे 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले 98.68 % म्हणजे 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्हयात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण 8 तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिल करीता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे.  प्रत्येक तहसिलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली (8) पंचायत समित्या कार्यरत आहेत.

जनगणना 2011 नुसार जिल्हयात एकूण 971 गावे असून त्यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्हयात 781 स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. जिल्हयात जालना महानगरपालिका असुन अंबड परतूर व भोकरदन या ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नगरपंचायत आहेत. अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा ‘क’ वर्गीय आहेत. जालना जिल्हयात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.

इतिहास :

जालना :

जालना शहर हे कुंडलीका नदीच्‍या किना-यावर वसलेले आहे. हे मराठावाडयातील एक महत्‍वाचे व्‍यावसायीक केंद्र आहे .धनवान मुहमद्दन व्‍यापारांच्‍या इच्‍छेप्रमाणे ज्‍याला या ठिकाणी खूप फायदा झाला होता, या ठिकाणाला जालना या नावाणे ओळखण्‍यास सुरूवात झाली. त्‍याचा विणकामाचा (जुलाह) व्‍यवसाय होता.

पुर्वी जालना शहर माती आणी विटांच्‍या भितींनी पुर्णतः सुरुक्षीत होते. मात्र आता त्‍यातील दोन दरवाजे अस्तित्‍वात आहेत एक मुर्ती दरवाजा आणि दुसरा हैद्राबाद दरवाजा. मलिक अंबरच्‍या काळात जमशेद खान याने शहराच्या पश्चिमेला मोती तलाव उभारला होता. त्‍याने एक मशीद आणि एक सराईही बांधली हेाती. पाणीसाठयात पाणीसाठ्यात पाणी साचविण्‍यासाठी एक भुमीगत पाईपलाईनही या शहरात उभारण्‍यात आलेली होती, तथापी ही यंत्रणा आता उपयोगात नाही. या शहराच्या गौरवशाली कालखंडात येथे पाच पाणीसाठे (तळे) तयार करण्‍यात आलेले होते. सध्‍या जालना शहराला प्रामुख्‍याने जायकवाडी धरण आणि घाणेवाडी तलावातुन पाणीपुरवठा करण्‍यात येतो.

अकबरच्‍या काळामध्‍ये जालना हे शहर अकबरच्‍या एका अधिका-याची जहागीर होते. काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्‍तव्‍य केल्याची नोंद आहे. निजाम-उल-मुल्‍क असफ जहॉ देखील अस म्हणतो की, औरंगाबादपेक्षाही हे शहर आरोग्‍यासाठी पोषक आहे आणि त्‍याने १७२५ मध्‍ये काबिल खान याला आदेशीत करून या शहराच्या पुर्वेला एक किल्‍ला बांधण्‍यास सांगितले हेाते. तोच आज मस्‍तगड या नावाने ओळखला जातो. त्‍यासोबतच बांधलेला बाले कि‍ल्‍यात पुर्वी नगरपरीषदचे कार्यालय हेाते.

या बालेकिल्‍याचा आतील आणि बाहेरील दरवाजा असफ जहॉंने स्‍वतः अनुक्रमे १७११ व १७२३ मध्‍ये बांधला होता. या बालेकिल्‍यात पर्शियन भाषेत हा किल्‍ला बांधल्‍याची दिनांक कोरलेला आहे. या बालेकिल्‍यात एक माठी विहीर आहे जी आता कच—याने भरलेली दिसुन येते. जालन्‍याचा जमीन महसुल मराठे गोळा करीत असत. मात्र त्‍यात नेहमी बदल होत असे. बराच काळ इथे शिंदेच्‍या पाठींब्‍यावर अधिकारावर होते. तथापी १७६० मध्‍ये झालेल्‍या उदगीरच्‍या लढाई नंतर पुण्‍यातील एका विरोधकाने सांगत हे ठिकाण ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍न केला. रक्‍तलांछीत लढाईत पुण्‍याच्या सरदाराची फसगत झाली. १८०३ मध्‍ये भोकरदनच्‍या पुर्वेला १० कि.मी असलेल्‍या असईच्‍या लढाईत कर्नल स्टिवनसनच्या तुकडीने विजय मिळवला होता. मराठा सत्‍तेचे वर्चस्‍व कमी झाल्‍यानंतर शेवटी हैद्राबादच्‍या निजामाकडे या ठिकाणाची सत्‍ता गेली होती. पुढे १८५५ मध्‍ये रोहीले आणी कंपनी सत्‍तेच्‍या सैनामध्‍ये झालेल्‍या लढाईत दोन्‍ही बाजुच्‍या साधारणतः १०० हुन अधिक सैनिक मरण पावले किंवा जखमी झाले, मात्र शेवटी रोहील्‍यांना शरणागती पत्‍कारावी लागली.

( ही माहिती भारताचे राजपत्र,महाराष्‍ट्र राज्य, औरेगाबाद जिल्हा, पृष्‍ठ क्रं १०१८,१०१९,१०२० येथुन घेण्‍यात आली आहे.)

जाफ्राबाद :

जाफ्राबाद हे ठिकान खेळणा आणि पुर्णा नदीच्‍या संगमावर वसलेले आहे. पुर्वी या ठिकाणाला मजबुत दगडी भिंतीची तटबंधी हेाती, मात्र काळाच्या ओघात त्‍याची वाताहत झाली आह. तथापी एक लहानशी गढी उत्‍तम स्थितीत आहे. या ठिकाणाचे नाव जाफ्राबादचा संस्‍थापक जफर खान याच्या नावावरुन पडले आहे. मुगल बादशाहा ओरंगजेब याने इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागीरी जफर खानला सोपवीली हेाती. जाफ्राबाद मध्‍ये एकुन सात मशीदी आणि मंदीरे उभारण्‍यात आलेली होती. यातील प्रमुख मशीदीवर औरंगजेबच्‍या आदेशाने रिजाजत खान याने पर्शीयन भाषेत १०७६ हिर्जीमध्‍ये (सन १६६४) नोंदी केल्‍या होत्‍या. तटबंधीच्या उभारणीच्या दरम्‍यान एक सुंदर अशी पाण्‍याची टाकी बांधण्‍यात आली होती. त्‍यावरील नोंदी नुसार याचे निर्माण शहाजहानच्‍या आदेशानुसार मुस्‍तफा खान याने १०४० हर्जीमध्ये (सन १६३०) मध्‍ये केल्याचे दिसुन येते.

(हि माहीती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य, औरंगाबाद जिल्‍हा पृष्‍ट क्रं १०१७, १०१८ येथुन घेण्‍यात आली आहे)

घनसावंगी :

पुर्वीच्या काळी हे एक महत्‍वाचे ठिेकाण होते. आजही इथे अस्तित्‍वात असलेल्‍या भग्नावेशातील वस्‍तुंवरुन त्याची खात्री पटते. उत्‍तर–पश्चिम दिशेला असलेल्या प्रचंड मोठया जागेवर हैद्राबाद सैन्‍याचे स्थळ उभारण्‍याचा विचार झाला होता. नरसिंहाच्‍या सन्‍मानार्थ वार्षिक यात्रा भरविण्‍यात येते.

(हि माहिती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य औरंगाबाद जिल्‍हा, पृष्‍ट क्रं १०१५ येथुन घेण्‍यात आली आहे)

अंबड :

अंबड हे शहर टेकडयांचे दरम्‍यान वसलेले आहे. हे शहर जालना–गेवराई रस्‍त्‍यावर आहे. ऐके‍काळी हे मराठवाडयातील एक महत्‍चवाचे व्‍यापारी केंद्र होते.

मत्स्योदरी मंदीर –

ऐकेकाळी या ठि‍काणाची खूप भरभराट झाली होती. आजही त्‍याची प्रचीती येथील पडक्‍या दगडी इमारती, भींती आणि दरवाज्‍यांवरून येते. स्‍थानिक परंपरेनुसार या शहराची स्‍थापना अंबरीष या हिंदु राजाने केली होती असे मानले जाते. तो शहराच्‍या पुर्वेला असलेल्‍या टेकडयांमधील गुहेत थांबल्याचा संदर्भ दिला जातो. सध्‍या या ठिकाणी मत्स्योदरी देवीचे मंदीर आहे, या टेकडीचा आकार माशासारखा आहे. या परिसरातील हे एक अत्‍यंत जुने मंदीर आहे. प्रतिवर्षी साधारणतः ऑक्‍टोंबर महिण्‍यात मंदीर परिसरात भव्य यात्रा भरते.

खंडोबा मंदीर –

अंबड शहरातच खडोबाचे मंदीर आणि दगडी बांधकाम असलेले पाण्‍याचे कुंड आहे. आठराव्‍या शतकाच्या शेवटी पवित्र आणि परोपकारी राजमाता अहिल्‍यादेवी होळकर यांनी या दोन्‍हींचेही निर्माण केले होते. खंडोबा मंदीराची रचना अशी आहे की, तीन मंदीरे एकत्रीत बांधलेली आहेत. अशा प्रकारच्‍या मंदीराची रचना प्रामुख्‍याने दक्षिणेत पाहायाला मिळते. उत्‍तरेस अशी रचना फारशी दिसत नाही. उजेडाची अशी उत्‍तम येाजना येथे आढळते. चोहोबाजुने दगडी भींतीचे बांधकाम आहे. समेारच्‍या भागात दोन्‍ही बाजुनी लोखंडी खांब आहे. त्‍याशिवाय चार लहान हत्‍तींच्‍या पाठीवर एक सिंह उभा आहे अणि पाचवा हत्‍ती त्‍याच्‍या तोंडात आहे. मंदीराचे तीन उंच शीखर आहेत. ते विटांनी बांधलेले असुन कोणतेही शीखर हे इतरासारखे नाही. गावात दगडी बांधकाम असलेली कुंड असुन त्याची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली होती. सध्या त्‍याची दुरावस्‍था झालेली आढळते.

या परीसरामध्ये जे पंथ उदयास आले त्‍यात रामभक्‍त स्‍वामी रामानंद यांचा एक आहे. ते अंबडजवळील गोंदी या गावाची होते. मात्र ते अंबडचे रहिवाशी झाले आणि त्‍यांनी आपल्‍या भक्‍तांना उपदेश केला. अच्‍युताश्रम स्‍वामी हे त्‍यांचे प्रमुख भक्‍त होते. अंबड आणि परिसरामध्‍ये आजही रामानंद स्‍वामी यांच्‍या आठवणी सांगितल्या जातात.

( हि माहिती भाताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य औरंगाबाद जिल्हा पृष्‍ठ क्रं ९३३, ९३४ येथुन घेण्‍यात आली आहे)

बदनापुर :

जालन्‍यापासुन दहा मैल पश्चिमेकडे दुधना नदीच्‍या किना-यावर हे गाव वसलेले आहे . असे म्‍हणतात कि, जनरल वेलस्ली आणि कर्नल स्‍टीव्‍हनसन यांच्या या ठिाकाणी असई लढाइच्या दोन दिवस आधी बैठक झाली होती व त्‍यात मराठयांवर करायच्‍या हल्ल्‍याचे नियोजन करण्‍यात आले होते. उत्‍तर – पुर्वच्‍या गावात, गर्द वनराईत मीर गुलाम शहराची दर्गा आहे.

(हि माहिती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य औरंगाबाद जिल्‍हा, पृष्‍ठ क्रं ९६१ वरुन घेण्‍यात आली आहे)

भोकरदन :

भोकरदन हे शहर खेळणा नदीच्‍या उजव्या किना-यावर वसलेले आहे. खेळणा नदी पूर्णेची उपनदी आहे.

1852 मध्ये जावळ नावाच्या एका खेड्यातल्या पटेलने त्यांच्या नियुक्तीच्या अभावामुळे संतप्त होऊन 300 अरब लोक आणि रोहिलांची ताकद जमवली आणि भोकरदनवर आक्रमण केले. पण तो अयशस्वी झाला. सुमारे सात वर्षांनंतर पुन्हा पुन्हा त्याने शहरावर हल्ला केला नायबने त्याचा बचाव केला. यानंतर रोहिला कधी कधी आक्रमण करत होती. औरंगाबादहून 500 सैनीक आणि 2 तिफांच्या सैन्याने त्यांना ताब्यात घेतले.
भोकरदन शहराला एका भग्नावशेष भिंतीने वेढलेले आहे. त्याच्या आत एक किला आहे ज्याचा वापर तहसीलदार आणि अन्य छोट्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना चालवण्यासाठी करण्यात येत होता. शहराच्या समृद्धीच्या खुणा कोसळलेल्या दगडी बांधकामाच्या भिंतींमध्ये दिसतात, एके काळी सुंदर फुलं आणि भाजीपाला बागांची ठिकाणे असलेल्या पट्ट्या शहराच्या बाहेर विखुरलेल्या आहेत.